आमची यशोगाथा
ग्रामपंचायत जलालपूर, नाशिक – निसर्गाच्या कुशीतलं एक जिवंत चित्र
ऐतिहासिक (पेशवेकालीन) स्थळे जलालपूर, नाशिक
वहारेश्वर महादेव मंदिर
ऐतिहासिक कारंजे
ऐतिहासिक नंदी व घंटा
बाणेश्वर महादेव मंदिर
जलालशहा बाबा दर्गा
श्री वहारेश्वर मंदिर जलालपूर, नाशिक
नाशिकच्या पावन भूमीतून वाहणाऱ्या गोदावरीच्या तीरावर निसर्गाच्या कुशीत वसलेले एक अध्यात्मिक आणि ऐतिहासिक रत्न म्हणजे जलालपूरचे श्री वन्हारेश्वर मंदिर. हे मंदिर पेशवेकालीन असून अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात बांधण्यात आले आहे. सुमारे १७५० ते १८०० या दरम्यान असल्याचे मानले जाते.
वहारेश्वर नावाचा इतिहास : वन्हारेश्वर हे नाव 'वर' म्हणजे 'आशीर्वाद' आणि 'ईश्वर'
म्हणजे 'शिव' व-हारेश्वर म्हणजे शिवाचा आशीर्वाद असे मानले जाते. मंदिर हे शिव भगवान यांना समर्पित आहे.
वैशिष्ट्यः हे मंदिर प्रामुख्याने पेशवेकालीन स्थापत्य शैलीचा एक उत्तम नमुना आहे. मंदिराची दगडी बांधणी आणि त्यावरील कोरीव काम त्या काळातील समृद्ध कलेची साक्ष देते. वन्हारेश्वर मंदिराची शैली ही वाईच्या मंदिराच्या शैली प्रमाणे आहे, सहसा नाशिकमध्ये या शैलीतील मंदिर पाहायला मिळत नाही. मुळ मंदिर जुने असले तरी वेळोवेळी नुतनीकरण करण्यात आले आहे. त्यातच सध्या या मंदिरात असलेले शिवलिंग काही वर्षांपूर्वी बसवलेले आहे. पुरातन शिवलिंगाला तडा गेल्यामुळे नवीन शिवलिंग बसवण्यात आले. भक्कम काळ्या दगडाने सुसज्ज अशी तटबंदी बांधल्याने मंदिर अगदी प्रशस्त वाटते. भक्कम तटबंदीमूळे नदीला पूर आला तरी मंदिराला इजा पोहचत नाही. ही तटबंदी त्रिकोणकार पद्धतीमध्ये बांधण्यात आली होती, जेणेकरून पुराचा मार हा मंदिराला हानी पोहोचवणार नाही. पुराचे पाणी कापले जाईल पण या तटबंदीच्या जागी नवीन बांधकाम करण्यात आले आहे.
पेशवे कालखंडातील कारंजा जलालपूर, नाशिक
इतिहासः मातोश्री गोपिकाबाई नानासाहेब पेशने (थोरले माधवराव पेशवे यांच्या मातोश्री) यांनी ही वास्तू बांधली आहे. १७६३ ते १७७० या काळात गोपिकाबाईनी नाशिकच्या आसपास अनेक घाट, मंदिरे आणि हौदांचे बांधकाम केले. १७७२ ला थोरले माधवराव पेशवे यांचे निधनानंतर गोपिकाबाईंचे नाशिकमधील वास्तव्य कायमस्वरुपी झाले. याच काळात जलालपुर मधील जलव्यवस्थापनाचे काम पूर्णत्वास गेले असावे असे मानले जाते. १७७३ ते १७७८ या काळात गोपिकाबाईंनी आपल्या अधिकारात या भागाचा विकास केला. जलालपूरचा कारंजा हा त्या काळातील 'नळ पाणीपुरवठा योजनेचा' एक भाग होता. ज्याद्वारे उंचावरून पाणी नैसर्गिक दाबाने आणून कारंजा उडवला जात असे. १८१८ नंतर पेशवाईच्या अस्तानंतर इंग्रज काळात या वास्तूकडे दुर्लक्ष झाले. मात्र जलालपूर येथील कारंजा आजही त्या काळातील स्थापत्यशास्त्राचा पुरावा म्हणून उभा आहे.
पाण्याचा स्त्रोत : जलालपूरच्या कारंजाला पाणी पुरवण्यासाठी लांबून पन्हाळी (खापराच्या पाईपलाइन) आणल्या होत्या. विज नसतानाही पाण्याचा कारंजा १०-१२ फूट उंच उडत असे इतके प्रगत तंत्रज्ञान होते. त्या काळात गंगापूर धरण्याच्या आसपासच्या नैसर्गिक स्त्रोतांकडुन पाणी या पन्हाळ्यांद्वारे कारंजा पर्यंत आणले जात असे.
वैशिष्ट्यः हा दगडी कारंजा सहा कोनी किंवा अष्टकोनी पद्धतीचा असून त्यात सुबक दगडी कोरीव काम पहायला मिळते. सध्या या कारंजाची दगडी तटबंदी शिल्लक राहिली असून कारंजाचा ऱ्हास झाला आहे.
अशा प्रकारचे कारंजे जलालपूर मध्ये तीन आहेत. त्यापैकी दोन कारंजांचे अवशेष पहायला मिळतात. तिसऱ्या कारंजा गावच्या विकास कामामध्ये पाडण्यात आला.